उत्सव!

दिवाळी म्हणजे सण चैतन्याचा, मांगल्याचा, प्रकाशाचा, आनंदाचा, प्रसन्नतेचा. लहान मुलांपासुन म्हातार्‍यांपर्यत सर्वांना आवडणारा! ऑक्टोबर हीटने त्रासलेल्या लोकांसाठी थंडीची चाहूल घेऊन येणारा. गरीब-श्रीमंत सगळेच आपापल्या परीने हा उत्सव आनंदाने साजरा करतात. ’दीवाली तो मनाने पडती है बॉस’, असं म्हणत कुणी मिळालेल्या बोनसमुळे तर कुणी कर्ज काढून ह्या दीपोत्सवात जल्लोषाने सहभागी होत असतात. "ह्या उत्सवात बायकापोरांच्या चेहर्‍यावरील आनंदापुढे, त्या पैश्याचे काय मोल?" असं म्हणत जो तो सढळ हाताने खर्च करत असतो. वर्षात कधीही नवीन कपडे घेणे नशिबात नसणारेही या उत्सवात कसंतरी करुन ते जमवण्याचा प्रयत्न करतात. हा सण नातेसंबध जोपासणारा, ऋणानुबंध दृढ करणारा असा आहे. कारण पोटापाण्यासाठी परगावी राहत असलेले लोक वर्षभरात इतर कधी नक्की नाही पण दिवाळीला अगदी आवर्जून आपल्या गावी, आपल्या माणसांजवळ जातात. नवीन खरेदी, सजावट, आतिषबाजी, आनंदी वातावरण, दिव्यांची रोषणाई, हे आजही होत असलं तरीही हे सगळं आता पहिल्यासारख राहीलेल नाही. कुठेतरी काहीतरी कमी आहे; तो उत्साह राहिलेला नाही,’वो बात नही रही…’ असं सारखं वाटत रहातं.

नुकताच नवरात्री-दसर्‍याचा झगमगाट संपला आणि लगेच सर्वांना हवीहवीशी वाटणारी दिवाळी आली. तसंही श्रावण महिन्यात येणार्‍या नागपंचमीपासून सुरु होणारया विविध उत्सवांमुळे थोडे दिवस पटापटच सरत असतात. आपल्या त्याच त्या आयुष्यामध्ये हे उत्सवच खरी बहार आणत असतात. एक गती आणत असतात. पण काही वर्षांपूर्वी, म्हणजेच माझ्या लहानपणी हया सणाची लज्जत काही वेगळीच होती. किंबहुना हे सण आले की मला माझे लहानपणीचेच दिवस आठवतात. खरंच हे सगळं बदललं आहे की वयोमानाप्रमाणे माझीच नजर बदलली आहे, कळत नाहीये. असो. इथे आपल्या संस्कृतीतील विविध सणोत्सवांची माझ्या भावविश्वातुन छोटीशी सफर तुम्हाला घडवायचा प्रयत्न करतो आहे.

आपल्या मराठी कालगणनेप्रमाणे गुढीपाडवा हया वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या उत्सवांची सुरुवात होत असते. वेळूच्या काठीची गुढी उभारुन हा आनंदोत्सव साजरा केला जातो. याच दिवशी श्रीराम रावणाचा संहार करुन आपला वनवास संपवून अयोध्येत परतल्याचे सांगीतले जाते. गुढीपाडवा यायच्या काही दिवस आधी आम्ही मित्र एकमेकांना विचारायचो, "अरे, त्या ह्या दिवशी सुट्टी आहे का रे?" मग समोरच्याने "गुढीपाडवा" म्हणायचा अवकाश, आम्ही एकत्र ओरडायचो, "नीट बोल गाढवा!" हा काही खूप मोठा विनोद नसायचा पण त्यायावर आम्ही जे खिदळायचो ते आठवलं की आजही हसायला येतं. गुढीपाडव्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती हे सण हजेरी लावुन जातात. यांपैकी हनुमान जयंती ही आमच्यासाठी खास असायची. कारणत्यादिवशी आम्ही आमच्या कुलदेवतेची पुजा करतो.शिवाय याच दिवशी ’ऑफिशिअली’ आंबा खायला सुरुवात करतो. आता हे पाळत नसलो तरी लहानपणी एकदम आवर्जून हे पाळायचो आणि झाडावरील हिरव्यागार कैर्‍यांकडे बघुन हनुमान जयंतीची वाट बघायचो. नंतर येते ती अक्षय्य तृतीया! आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी सुरु केलेले कार्य अक्षय्य - कधीही न संपणारे राहते, असा समज असल्याने आम्ही अभ्यासाचे तसेच इतर काही अल्पजीवी संकल्प मोठ्या दिमाखात करायचो.

त्यानंतर वैशाखवणवा अन ज्येष्ठाच्या उष्मा सहन केल्यावर ज्येष्ठातील पौर्णीमेला येते ती वटपौर्णीमा. सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून सुवासिनी या दिवशी आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवून वडाची पुजा करतात. आत्ताही स्त्रिया नटून थटून वडाची पुजा करतात पण तिथे पहिल्या सारखे विविध खेळ रंगत नाहीत. मला वटपौर्णीमा आठवते ती त्यादिवशी आमच्याकडे आणल्या जाणार्‍या मोठ्या फणसामुळे. ह्यानंतर आषाढात येते ती आषाढी एकादशी. ’एकादशी आणि दुप्पट खाशी’, ही म्हण खरी ठरण्यासाठी आपलाही काही हातभार लागावा या सद्‍हेतूने ह्यादिवशी मी अगदी आवर्जून उपवास करतो. मग श्रावणात अनेक सणांची नांदी घेवुन येते नागपंचमी. हयादिवशी आमच्याकडे सापाच्या प्रतिमेला पाच कडधान्याचा नैवेध्य दाखवला जातो. यादिवशी आमच्याकडे भुज्याचं पीठ बनवतात, जे मला अतिशय आवडतं. मग येतं भाऊ-बहिणींच्या अनमोल नात्याला धाग्यात गुंफणारं रक्षाबंधन आणि सोबतच नारळी पौर्णिमा! नारळी पौर्णिमेला आमच्याकडे मस्त नारळी पाक बनवला जातो. यादिवशी कोळी लोक आपल्या बोटी पाण्यात नेण्यास सुरु करतात. म्हणजेच बाजारातील माशांच्या विविधतेत वाढ होण्यास सुरुवात होते त्याचा अनंद वेगळाच.

भाद्रपद घेउन येतो जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्णजयंती आणि गोपाळकाला. चिखलात माखून एकमेकांचा भार पेलुन तोल सावरत फोडलेल्या दहीहंड्या. खरंच, काय मजा यायची! आता मात्र दुरुन फक्त बघत असतो हे सगळं. तसंही आता या उत्सवात अनेक राजकारणी घुसल्याने थर वाढवायची वेगळीच जीवघेणी चढाओढ सुरु झालेली आहे. असो. पूर्वी आम्ही बाहेरच्या हंड्या कमी म्हणून की काय, तर घरात पण छोटीशी दहीहंडी बांधून मजा घ्यायचो. ह्यानंतर वाजतगाजत मोठ्या दिमाखात आगमन होतं बाप्पाचं. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी अन् मोजक्याच जागी येणारे बाप्पा आता जवळ जवळ प्रत्येक घरात येऊ लागल्याने, जो तो आपापल्या बाप्पाला गोंजारत बसतो. सार्वजनिक ठिकाणी आरतीला वगैरे हजेरी लावली की झालं! पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवात यायची ती मजा आता उरलेली नाही. शिवाय इथेही मुर्तीच्या आकाराबाबत वेगळीच स्पर्धा असते. मला तर वाटतं, ’एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना सगळ्यांनी मानली पाहिजे. जे पर्यावरणासाठी आणि बाप्पावरील श्रद्धेसाठीही चांगलं राहील. बाकी काही असो, या दिवसांत वेगवेगळी डेकोरेशन्स, चलचित्रं, जोरजोरात बेभान होऊन म्हटलेल्या आरत्या, मोदकांचा प्रसाद, जागरण यामुळे वातावरण एकदम बाप्पामय होऊन जातं.

बाप्पांना निरोप दिल्यानंतर मला वेध लागतात ते नवरात्रीचे. तसा हा सहामाही परीक्षेच्या एकदम जवळचा काळ. कधी कधी तर ह्या दिवसातच परीक्षा सुरु असायच्या. पण मी गरबा कधीच चुकवायचो नाही. आता मात्र सगळ्या रात्री नाही जमत नाचायला. तरीही यावर्षी सेकंड शिफ्टचे तीन दिवस सोडले, तर इतर सहा दिवस खुप नाचलो पण खरं सांगू? पहिल्यासारखी मजा नाही आली. पूर्वी आम्ही रात्री एक दीड पर्यंत नाचायचो. आता ११ च्या आसपासच आवरतं घ्यावं लागतं. इतर वेळी नेहमी उशिरा पोहोचणारी पोलिसांची गाडी इथे मात्र अगदी वेळेवर पोहोचायची. इतर वेळी थोडीशी हालचाल केल्यावर थकणारे आम्ही, इथे सतत दीड-दोन तास नाचतो,त्यासाठी बळ कुठुन येते ते मला अजून उलगडलेलं नाहीये.गुजरातमध्ये तर अजूनही रात्री साडेतीनपर्यंत गरबा चालतो. दहाव्या दिवशी येतो दसरा म्हणजे विजयोत्सव - विजयादशमी! या दोन्हीशी नातं असलेला सण. आपट्याची पानंरूपी सोनं एकमेकांना देणे, गोडधोड जेवण, रावणदहन, वह्यापुस्तकं-शस्त्रांची पुजा, दरवाज्यांना-गाड्यांना पिवळ्याधम्मक झेंडुच्या फ़ुलांची अन आंब्याच्या पानांची तोरणं... सगळं कसं एकदम चैतन्यदायक! आता शाळांना (निदान आमच्या इकडच्या तरी ) दसर्‍याला सुट्टी असते. मला आठवतात ते दिवस. सकाळीच उठून तांदुळ, हळद-कुंकू, साखर यांच्या छोट्या छोट्या पुड्या, अगरबत्ती, माचिस आणि एक एक च्या आकड्यांनी पाटीवर काढलेली सरस्वती हे सगळं घेऊन शाळेत, ’हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली’ म्हणत केलेलं सरस्वती पूजन. हया सरस्वती पूजनाची मजा आताच्या मुलांना कशी कळणार?

दसरा झाल्यावर पुढचे वीस दिवस जातात ते दिवाळीच्या तयारीत. म्हणजेच साफसफाई, रंगरंगोटी, खरेदी, फराळ बनवणे, पणत्या, रांगोळ्या, तोरणांची तयारी करण्यात. तशी मध्येच अंधारात चंद्राकडे बघत सुकामेवा टाकलेलं आटवलेलं दूध प्यायची लज्जत देणारी कोजागिरी पौर्णीमा, आम्हाला तिची दखल घ्यायला लावते. नाहीतर तशी आम्हाला दसर्‍याच्या अगदी दुसर्‍या दिवसापासून दिवाळीची स्वप्न पडायची. हया दिवसात परीक्षा असल्या तरी कधी कधी भर पेपरला मनातफटाके फुटत असायचे. खरच चातकालाही कॉम्प्लेक्स यावा, अशी तेव्हा दिवाळीची वाट पाहायचो आम्ही. दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नान करुन, नवीन कपडे अंगावर चढवून, चिरांटेरूपी (टरबुजासारखं दिसणारं पण आकाराने लहानसं फळ) नरकासुराचा वध करुन, फटाके उडवण्याची शर्यत लागायची. फुलबाजे हाताने गोल गोल फिरवत ’दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ म्हणायचं, कोणी फटाके लावायला गेलं की ’अरे थांब! तिथे सुतळी बॉम्ब लावलाय बघ’, सांगत त्याला दचकवायचं. मनसोक्त फटाकेबाजी झाल्यावर थकून भागून लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा अशा फराळावर हल्लाबोल करायचो. सगळे एकत्र आल्यामुळे आणि अभ्यासाचही टेन्शन नसल्याने दिवसभर विविध खेळ खेळत, चंपक-ठकठकच्या दिवाळी अंकाचा आस्वाद घेत रात्रीची वाट पाहिली जायची. रात्री रांगोळ्या, दिवे-पणत्या, आकाशकंदील, लायटिंगची तोरणं हयांच्या सजावटीत मोठ्यांना मदत करायची. मग परत एकदा फटाक्यांची आतिषबाजी सुरु करायची. एकूणच वातावरण कसं प्रसन्न असायचं. एक वेगळाच उत्साह असायचा.

मग पौष महिन्यात येते मकरसंक्राती. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा दिवस तसा भारतात जवळजवळ सगळीकडेच वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. ’तिळगुळ घ्या आणि गोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका,’ असं म्हणत तीळगुळाचे लाडू वाटणे, पतंग उडविणे ही हया दिवसाची वैशिष्ट्यं. पण का माहित नाही, हया दिवशी पानिपताची आठवण येउन माझ्यावर उदासीचा थोडीसा प्रभाव असतोच. संक्राती नंतर माहाशिवरात्री येते. हयादिवशी आमच्याकडे उपवासाला कोनफळ, रताळं हयांसारखी कंदमुळ उकडून खाल्ली जातात. हयादिवशी आमच्या गावात जत्राही असते, त्यामुळे हा दिवसही मस्त जातो. त्यानंतर फाल्गून महिन्यात रंगाची उधळण करत येते ती होळी! रात्री होळी पेटवल्यावर त्यात टाकलेले अर्धे भाजलेले नारळ काढून खायला काय मजा यायची. तशी हया दिवशी घरीही पुरणपोळीची मेजवानी असतेच. सकाळी उठून एकेकाच्या घरी जात सगळे एकत्र यायचो. मग त्या ’होळी रे होळी पुरणाची पोळी, अशा
घोषणा. आधी स्वत:च्याच चेहेर्‍यावर तेल लावुन त्यावर रंग चोपडून ठेवायचो आणि मग दुसर्‍यांना रंगवायचो. जेवढा प्रतिकार जास्त व्हायचा तेवढा जास्त रंगला जायचा समोरचा. जेवणापुरती घरी हजेरी लाऊन संध्याकाळपर्यंत असच भटकून नदीवर जाउन आंघोळ करायचो. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी…

हया शिवाय अभिमानाने छाती फ़ुलायला लावणारे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्तक दिन, शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्र दिन असे ही उत्सव मध्ये येतात. खरंतर लहान असतांना स्वातंत्र्यदिनी सकाळीच उठल्यावर कायस्फुरण चढलेलं असायचं. आतून एकदम असं काहीतरी सळसळतं वाटत राहायचं! त्यात ती देशभक्तीपर गाणी ऐकली की एकदम भरुन यायचं. पण आता तसं होत नाही. आजकालची मुलं टिव्ही, संगणक, मोबाईल, सुट्टीच्या दिवशी असलेल्या ट्युशन्स हयामुळे हया सणांची खरी मजा घेऊ शकत नाहीत हे पाहून वाईट वाटतं. खरंच हया सगळ्या सणा-उत्सवासाठी तरी "मला बालपण देगा देवा"असं मी म्हणेन. शिवाय या सणांच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे रात्री गप्पांची जी मैफल रंगते, तिची लज्जतच वेगळी. हया उत्सवांना धर्म, जात, देश हयांचं काही बंधन नसतं. प्रत्येक संस्कृतीचा ते अविभाज्य घटक आहेत. सगळीकडेच वेगवेगळे उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. ’साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ किंवा ’तू माझ्या जीवनात आलीस तोच खरा उत्सव आहे, बाकी काही नाही’, असे कोणीही कितीही म्हटले तरी विचार करा जरा - हे कोणतेच सण नसते तर जीवन किती नीरस, कंटाळवाणं झालं असतं. तेव्हा आपल्या रुक्ष जीवनात आनंदाचा शिडकावा करण्यासाठी हया उत्सवांची गरज आहे. तेव्हा आनंद देणारे, नातेसंबध वृद्धींगत करणारे हे उत्सव आपल्याला असेच जिवंत ठेवायचे आहेत.

ही दीपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा!

--
देवेंद्र चुरी
bcoolnjoy@gmail.com

3 comments:

Suhas Diwakar Zele २ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:३८ AM  

वाह सगळ्या सणासुदीचे दिवस आठवून दिलेस :)
दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा

अपर्णा ४ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:५० AM  

देवेंद्र एकंदरीत निराशावादी सूर लागला आहे त्यामुळे थोड वाईट वाटतय....पण काळाबरोबर आपल्याला बदलावच लागत हे पण बघ....किंवा आपल्याला हवा तो बदल आपणच प्रयत्न करून आणावा लागतो....तसं पाहिलस तर कुणाच्याच लहानपणीचे दिवस पुन्हा तसेच येणार नसतात...आता आपणही वेगळ्या जबाबदारीच्या ओझ्यात अडकलो आहोत..असो..
अरे तू वटपोर्णिमेला येणारे छोटे छोटे आंबे विसरलास का??

क्रांति ८ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:०४ PM  

कालमानाप्रमाणे सण-उत्सव साजरे करण्यात काहीसा फरक पडला असला तरी त्यामागच्या भावना फारशा बदलत नाहीत. अजूनही सण म्हटल की उत्साह, चैतन्य येताच! सगळ्या सणांची आठवण ताजी झालीय या लेखानं

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.