आता तरी विचार करा

आपण कित्येकदा विचार करतो, ’मी असे करीन, मी तसे करीन.’ परंतू प्रत्यक्षात करण्याची वेळ आल्यावर मात्र त्या गोष्टींचा अथवा विषयाचाच आम्हाला विसर पडतो. अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज मी मनसोक्त बोलणार आहे.

मछली जल की रानी है
जीवन उसका पानी है
हाथ लागाओ डर जाती है
बाहर निकालो मर जाती है

ही कविता लहानपणी आपण सगळ्यांनीच गुणगुणली आहे. जशी मासळी पाण्यावाचून मरून जाते, तसेच मानवजातीचे हाल पाण्याशिवाय होतील. आपणही पाण्यावाचून तडफडून मरू शकतो, असे मर्म ही कविता आजच्या क्षणी शिकवून जाते. आम्ही नेहमीच वाचत असतो वा ऐकत असतो – पाणी हे जीवन, अमृत आहे. मनुष्यच काय तर पृथ्वीतलावरील असंख्य जीव-जंतू, पिके, शेतकरी या पाण्यावरच विसंबून आहेत. या अमूल्य साधनांचा वापर आपण खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. परंतु खरेच आपण या जीवनवर्धक अमूल्य जलाचा वापर सांभाळून करतो, याबद्दल माझे मत साशंकच आहे. पाण्याचा अपव्यय, नाश तसेच त्याला दूषित करणे, हे कार्य मनुष्य हा आपल्या स्वार्थाकरिता करीत आहे. पर्यावरण तज्ञांनी सांगितल्यानुसार काळाची घंटा वाजलेली आहे की आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण करावे. पाणी जपून वापरावे असे वरचेवर सांगितले जाते पण कित्येक समजूतदार व जबाबदार लोकच पाण्याचा गैरवापर व नुकसान जास्त करीत आहेत.

समुद्र हा अथांग असला तरी खारट पाणी कोणीच पिऊ शकत नाही. पण ह्या जीवनदायी अमृताचा जन्म हा त्याच्यापासून तयार झालेल्या मेघवर्षावातून होत असतो, हे सत्य आम्हा सर्वांना उमगत असले, तरी उमजत नाही. आम्ही समुद्राच्या पाण्यालाही सोडलेलं नाही. त्यालाही स्वार्थाकरिता दूषित करीत आहोत.

आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती पाण्याचा वापर गरजेनुसार करते, तरी आपण घरी पाण्याचा वापर सांभाळून करतो पण व्यवसायिक क्षेत्रात वा घराच्या बाहेर पाणी वाया जात असल्यास त्याची पर्वा करीत नाही. बहुतेकांना वाटतं, ’याचं बिल मला थोडंच भरायचं आहे, तेव्हा वाहू दे पाणी, माझं काय बिघडतं? ही काय माझी एकट्याची जबाबदारी आहे?’

यावर मी केवळ एक छोटसं उदाहरण देत आहे. आपण व्यवसायिक दृष्टीने कुठल्याही कार्यालयात काम करतो. समजा, एका व्यवसायिक इमारतीत उपलब्ध असलेल्या एकूण नळांपैकी ५० टक्के नळांमधून आमच्या निष्काळजीपणामुळे अथवा गळतीमुळे, दरताशी १०० लिटर पाणी वाहत असल्यास, एका वर्षाला तब्बल ८.७६ लक्ष लिटर पाणी एकट्या इमारतीतून वाया जाते. आता तरी विचार करा की केवळ आमच्या हलगर्जीपणामुळे अशा किती तरी व्यवसायिक कार्यक्षेत्रातील इमारतींमधील पिण्यायुक्त पाणी गटारात वाया जात आहे. सदर पाण्याच्या वापरामुळे निदान १०० हेक्टर शेतजमीन पिकांसाठी उपजावू होऊ शकते. हिरव्यागार शेतीमुळे आम्हा सर्वांना धान्य प्राप्त होऊ शकते. परंतु कार्यालयातील सुशिक्षित लोकच निष्काळजीपणाने पाण्याचा अपव्यय करीत आहेत. दूषित होणार्‍या पाण्यामुळे आम्ही आपल्या धरणीचे, प्राणीमात्रांचे व संपूर्ण मानवी जीवनाचे व भावी पिढीचे किती नुकसान करीत आहोत, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

काही सरळ सोप्या मार्गाने आपण पाण्याचा वापर आटोक्यात ठेवू शकतो:

१. जेव्हा नळ वाहताना दिसतील, तेव्हा काळजीपूर्वक बंद करा.
२. गळणारे नळ, तोट्या लगेच बदला अथवा दुरूस्त करून घ्या.
३. प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक पाणी जिरावे या पद्धतीचा अवलंब करावा.
४. घर, गॅलरी, अंगण पाण्याने धुवून काढण्यापेक्षा पाण्याने पुसून काढावे.
५. शहरी विभागातील ज्या भागात पाणी कपात नसते, त्यांनी कपात असलेल्या भागातील नागरिकांचा जाणीवपूर्वक विचार करून पाणी वापरावे.
६. ग्रामीण भागातील लोकांनी पाणी तथा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून शेती करावी व पाणी वाचवावे.
७. पाण्याच्या सतत वाहत्या धारेत कपडे, भांडी धुवू नयेत.
८. बाथटबमधे आंघोळ करण्यापेक्षा कमी पाण्यात आंघोळ करावी.
९. घरातील झाडांना गरज असेल तेव्हा झारीने पाणी टाकावे.
१०. आपल्या मुलांना पाणी वाचविणे हे त्यांच्या भविष्यासाठी कसे उपकारक राहील, याबाबत समजावून सांगावे.

तांत्रिक पद्धतीने पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत आपण थोडी चर्चा करूया:

पाण्याचे संचयन म्हणजेच वॉटर हारवेस्टींग होय. दरवर्षी कित्येक लक्ष गॅलन पाणी आम्हाला पावसाद्वारे प्राप्त होते परंतू बरसणार्‍या पाण्यापैकी ४० ते ५० टक्केच पाणी हे तलाव, धरण व नद्या यांसारख्या जलाशयात साचते अथवा जमा होते. उर्वरित पाणी गटारावाटे वाहून जाते. जमीनीत पूर्वापार पद्धतीने पाणी साचल्यामुळे जमीन पाणी शोषून घेत होती. ह्या शोषून घेण्याच्या प्रक्रियेमुळे जमीनीतील पाण्याची पातळी कमी अधिक प्रमाणात वाढत होती. परंतु, आज रस्त्याच्या कडेला केलेल्या कॉंक्रिटीकरणामुळे व घराच्या सभोवतालच्या परिसरात सिमेंटीकरणामुळे जमीनीचा भूभाग दिसेनासा झाला व पाणी जमीनीअभावी शोषून घेणारच नाही. या सर्व बाबींचा परिणाम भूजलाच्या पाण्याच्या पातळीवर नक्कीच होत आहे. त्यामुळे कॉंक्रिटीकरणाच्या जंगलांनी, आमच्या जमीनीचा निचरा घालवून तिचा र्‍हास केलेला आहे.

पण यावर अगदी छान उपाय म्हणजे पाणी संचयन होय. ही पद्धत भारतात परंपरागत आहे. जसे पूर्वी राजस्थान, गुजरात येथे पाण्याच्या कमतरतेमुळे संचयनाकरीता कुंड, बावडी, स्टेप वेलचा वापर करण्यात येत होता. आता हे संचयन आम्ही घराच्या छताचा वापर करून, मोठ्या शहरांमधेही मोठी फ्लॅट सिस्टीम, क्लब, हॉटेल्स, हॉस्पिटल व आधुनिक सिनेमाघरे यांच्या लांबच लांब छतांचा वापर योग्य पद्धतीने करून पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याचे संचयन उत्तम तांत्रिक पद्धतीने करू शकतो. संचयनामुळे कित्येक गॅलन पावसाचे पाणी या इमारतींच्या खाली तळामध्ये साठवून ठेवता येते. वरील सर्व ठिकाणी रोजच्या दैनंदिन म्हणजेच प्रसाधनगृहातील वापराकरीता व इमारती स्वच्छ करण्याकरीता बांधकामासारख्या व्यवसायिक कामाकरीता संचयन केलेल्या पाण्याचा वापर करण्यात यावा. जेणेकरून आपल्या देशातील पिण्याच्या पाणी हे घर, कार, गॅलरी व अंगण स्वच्छ करणे, तसेच इतर किरकोळ बाबींकरीता वाया न घालवता, या दैनंदिन कार्याकरीता लागणार्‍या पाण्याचा बहुतांशी वापर संचयन पध्दतीन संचित केलेल्या पाण्यामधून केल्यास, खारीच्या वाट्याने 'थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण खर्‍या अर्थाने सार्थ होईल.

पर्यावरणाच्या बाबतीत लोकांमधे जागरूकता निर्माण करण्याकरीता शसनाने लोकांना पाणी वाचविण्याबाबत आवाहन करावे व नियमाने पाणी संचयन पद्धत अंमलात आणण्यास सक्ती करावी. पण हे करत असताना स्वत: शासनाने ही पद्धत अंगिकारून आपल्या मोठ्या कार्यालयांच्या छताचा वापर तांत्रिकदृष्ट्या पावसाच्या पाण्याचे संचन करून व त्या पाण्याच्या पुनर्वापर करून जनतेसमोर आदर्श मांडून द्यावा. ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास पावसाळ्यात जे ५० टक्के पाणी गटारातून वाहून मुख्यत्वे नाल्याद्वारे समुद्रात वाहून जाते, त्यापेक्षा त्यास वाचविण्याचा प्रांजळ प्रयत्न आपल्या सर्वांकडून व्हावा, जेणेकरून या धरणीची उत्पादकता, पोषकता व जमीनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत व्हावी. येणार्याज नवीन पिढीसाठी पाण्याचे संगोपन करून आदर्श प्रस्थापित करावा. तरच ही वसुंधरा सृजलाम सुफलाम होण्यास मदत होईल.

--
माधुरी माणिककुवर
mrsmadhuri2009@gmail.com

1 comments:

अपर्णा ४ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:४७ AM  

मी अगदी लहानपणापासून माझ्या आईला घरातल भाज्या, तांदूळ धुतलेले पाणी इ. झाडांना घालताना पाहिलंय अशा अनेक छोट्या छोट्या गोष्ठी आहेत फक्त करणार कोण हा प्रश्न आहे....

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.