मराठीवर हल्ला, इंग्रजी जखमी

महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचा संकोच केला तरच इंग्रजी येईल, अशी अंधश्रद्धा अनेक शिक्षितांच्या मनात रुजलेली आहे.हा विचार घातक आहे. यामुळे केवळ मराठीच नव्हे, तर या शिक्षितांची आवडती इंग्रजी मात्र जखमी झाली आहे.

या राज्यात अनेक शाळांत विद्यार्थ्यांना मराठीच्या तासाशिवाय इतर वेळी मराठी बोलायला बेकायदेशीरपणे बंदी घातली जाते. ही बंदी विद्यार्थी व पालक निमूटपणे स्वीकारुन पाळतात. अशी बंदी असलेल्या सर्व शाळांतील मुला-मुलींचे इंग्रजी फ़ार कच्चे आणि मराठी भयावह असते. मराठी न बोलण्याने इंग्रजी नीट येईल असे अनेक पालक,शिक्षक समजतात. नाचले नाही,तर स्वैपाक नीट येईल असे म्हणण्यासारखा हा चुकीचा विचार आहे. एकात लोह व दुसयात 'क' जीवनसत्व असे दोन पदार्थ असताना एक खाल्ला नाही तर दुसरा घटक आपोआप भरपूर मिळेल, असे होत नाही. या मराठीबंदीने काही पिढ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

स्वत:च्या परिसराची भाषा ज्याला नीट येते, त्यालाच इतर भाषा सहज शिकता येतात असे भाषाशास्त्र म्हणते. महाराष्ट्रात मराठीवर बंदी घालता येत नाही. मराठी राजभाषा असल्याने ही बंदी घालण्याचा बेकायदेशीर प्रकार जिथे असेल तिथे लेखी पत्र देऊन थांबवला पहिजे. कायद्याचा मुद्दा बाजुला ठेवला तरी अशी बंदी घालून शिक्षक व ती मान्य करुन पालक, आपल्या मुलांचे भाषेसंदर्भात कायमचे नुकसान करीत आहेत, याचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले आहेत:

तीन वर्षाचे मूल शाळेत जाते. त्याला मराठी न शिकवताच येत असते. त्याला मराठीतून बडबड करायची असते. शाळेत व घरी इंग्रजीच्या अट्टहासापोटी मराठी बोलू देत नाहीत. काही अतिउत्साही लोक मराठी वाक्यात इंग्रजी भेसळीचा संस्कार लहान वयातच मुलांवर करतात. यातून मुलांना दोन्ही भाषा चुकीच्या पद्धतीने बोलण्याची सवय लागते. 'मुले बहुभाषिक व्हावीत, यासाठी आम्ही मराठीत इंग्रजी घुसडतो', असे समर्थन केले जाते. बहुभाषिकतेसाठी ६५०० भाषांपैकी फ़क्त इंग्रजीची भेसळ का? मुळात भेसळ का? याचे उत्तर या पालकांकडे नसते. येणारी भाषा बोलायला बंदी आणि न येणारी भाषाच बोलायचा आग्रह या कोंडीत मुले सापडतात.या कोंडीतून सुटण्याचा एकच मार्ग मुलांकडे राहतो,तो म्हणजे न बोलणे. अशी बंदी ज्या शाळांत आहे त्या सर्व शाळांतील मुलांचा भाषाविकास नीट होत नाही. ही समस्या महाराष्ट्रात मोठी आहे,कारण इथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा जास्त आहेत आणि त्यापैकी अनेक शाळा ही अयोग्य बंदी घालतात. अमेरिका व इंग्लंडमध्ये अनेक भारतीय, पाकिस्तानी, फ़्रेंच, रशियन व इतर देशातील विविध भाषक मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकतात. तिथे मुले आपल्या मातृभाषेत काही वाक्ये बोलली तर शाळेतील शिक्षक मुळीच आक्षेप घेत नाहीत. जगातील इतर कोणत्याही देशात मातृभाषाबंदी लादणारी एकही शाळा नाही (कोठे असेल तर वाचकांनी कळवावे). भारतातील इतर राज्यातही असा अयोग्य मातृभाषाबंदीचा प्रकार क्वचितच आढळतो. तिथे असा प्रयत्न केला तर फौजदारी कारवाई आणि पालकांकडून हिंसक प्रतिक्रिया येण्याची भिती असते.

भारतीय भाषा संवाद, लेखन, आकलन, भाषण यासाठी खूप विकसित आहेत. या भाषांत असलेल्या उत्तम सोयी इंग्रजीत तसेच इतर अनेक अभारतीय भाषांत नाहीत. बौद्धिक विकासासाठी भारतीय भाषांवर प्रभुत्व असणे उपयुक्त ठरते. भारतीय भाषा येत असताना त्या वापरु न देणे, हे त्या भाषांसोबत इंग्रजीचीही वाट लावण्याचा प्रकार आहे. ज्या शाळांनी मातृभाषाबंदी लादली आहे, अशा महाराष्ट्रातील शाळांमधील मुलांचे इंग्रजी भयंकर कच्चे आहे. या शाळांतील मुलांना a,an,the चा वापर योग्य प्रकारे करता येत नाही. त्यांचे भूत, भविष्य, वर्तमान काळांचे भान हरवलेले आढळते. त्यांना १० वीतही स्वतंत्रपणे वाक्यरचना करणे अवघड जाते. याउलट ज्या शाळांत मातृभाषाबंदी नाही अशा शाळांतील मुलांचे इंग्रजी तुलनेने अधिक चांगले असते, त्यांना वरील तिन्ही गोष्टी नीट जमतात. विशेषत: मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी व्यवस्थित असते.

महाराष्ट्रात इंग्रजीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत, त्यापैकी एक म्हणजे ती विश्वभाषा आहे.

वस्तुस्थिती मात्र तशी नाही. जगाची लोकसंख्या ६५० कोटींहून अधिक आहे. त्यातील फ़क्त ५१ कोटी लोकांना इंग्रजी लेखी-तोंडी वापरता येते, त्याशिवाय आणखी सुमारे२०-२५ कोटी लोकांना इंग्रजीची जुजबी ओळख आहे. यातील ४२ कोटी भारतीय आहेत, जे केवळ सरकारी आडमुठेपणामुळे नाइलाजाने इंग्रजीचा थोडाफ़ार वापर करतात. जगातील सुमारे ५५०-५७५ कोटी लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच इंग्रजीचा वापर करत नाहीत. भारतातील अनेक जाहिरातीत 'इंग्रजीवर प्रभुत्व' अशी अट असते.असे इंग्रजीवर प्रभुत्व असणारे लोक मात्र जगात १ कोटीदेखील नसावेत.

महाराष्ट्रातील दुसरी अंधश्रद्धा आहे की,शास्त्र-तंत्रशिक्षण इंग्रजीतच घ्यावे लागते व सर्व देशांत ते इंग्रजीतच घेतले जाते.

वस्तुस्थिती तशी नाही. १८३ देशांपैकी फ़क्त १० ते १५ देशांत शास्त्र-तंत्रशिक्षण इंग्रजी माध्यमात असते.भारतातील कर्नाटक. आंध्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, पंजाब, केरळ, राजस्थान, आसाम, हिमाचल, हरियाना, काश्मीर या राज्यांत बी.एस्सी, फ़ार्मसी, इंजि./व्यवस्थापन हे अभ्यासक्रम तेथील राजभाषेत उपलब्ध आहेत व बहुसंख्य विद्यार्थी त्याच भाषेतून हे अभ्यासक्रम शिकतात. महाराष्ट्रात यातील अनेक अभ्यासक्रम केवळ इंग्रजीत शिकण्याची सक्ती केली जाते. याचा मोठा तोटा महाराष्ट्राला झाला आहे. या विषयांतील महाराष्ट्रीय पदवीधर इतर राज्यांतील भारतीय भाषांतून शिकलेल्या त्याच विषयांतील पदवीधरांपेक्षा कमी पडतात.इंग्रजीत शिकण्याच्या सक्तीमुळे इथे बरेच शब्द-वाक्ये पाठ होतात पण संकल्पना स्पष्ट होत नाहीत. इंग्रजी ही तंत्र-शास्त्रविषय शिकण्यासाठी उपयुक्त भाषा नाही हे त्याचे कारण!

असो, आजवर या अंधश्रद्धा जोपासल्याने झाले ते नुकसान खूप झाले. आता ही चूक आपण सुधारू शकतो. मातृभाषाबंदी यानंतर लादू नये यासाठी महाराष्ट्रातील शाळाचालक-शिक्षक-मुख्याध्यापक यांना ही बाब समजावून देण्याची गरज आहे. इंग्रजीकडे केवळ एक जादा भाषा म्हणून बघितले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेकजण फ़्रेंच भाषा शिकतात, ती केवळ एक भाषा म्हणूनच! फ़्रेंच नीट येण्यासाठी आपण भौतिक-रसायनशास्त्र वगैरे विषय फ़्रेंचमधून शिकत नाही. जर्मन, रशियन, कानडी, मल्याळी शिकतानाही आम्ही हाच द्रुष्टिकोन ठेवतो. मात्र इंग्रजीबाबतच्या वरील अंधश्रद्धांमुळे इतर भाषांबाबत असलेला हा विवेक आपण इंग्रजीबाबत ठेवत नाही. यामुळे मराठीची हानी तर होतेच,पण जी इंग्रजी नीट यावी म्हणून मातृभाषाबंदी लादली व पाळली जाते ती इंग्रजी हमखास बिघडते.विद्यार्थी-पालक-शिक्षक-शाळा आणि शिक्षणाच्या हितासाठी हा विवेक यापुढे बाळगला पाहिजे.

अलिकडे ही जाणीव काही शाळांत झालेली आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे इंग्रजी माध्यमाच्या मुला-मुलींना सर्व विषय मराठी-हिंदीत समजावून देण्याचा निर्णय त्या संस्थेच्या अध्यक्षांनी घेतला व त्याने मुलांचा खूप फ़ायदा होतो यात काही शंका नाही. भारतीय भाषा येणे हे आपले भाग्य आहे. कोणत्याही कारणाने ज्यांनी मुले इंग्रजी माध्यमात घातली आहेत, अशांनी सर्व विषय मुलांना मराठीतूनही शिकवले तर प्रचंड फ़ायदा होईल. इंग्रजी भाषा शिकणे आणि इंग्रजीतून इतर विषय शिकणे यात फ़रक आहेच, तो नाकारणे आजवर घातक ठरले आहे. ज्या मराठी भाषकांना आपल्या मुलांची संपूर्ण प्रगती हवी आहे, त्यांनी मुलांना बालवाडी ते पदवी असे सर्व शिक्षण मराठीतून द्यावे असे मी आवाहन करतो. शाळा कोणत्याही माध्यमाची असली तरी घरी मराठीतून शिकवावे. फ़क्त इंग्रजीतून शिकायचा हट्ट न धरल्याने भारतातील अनेक राज्ये शिक्षणात आपल्यापेक्षा समृद्ध झाली आहेत. मराठीची जोड देणे महाराष्ट्रात टाळले गेले यामुळे कमी पडतो हे लक्षात घेउन आता शिक्षणाबाबत आपले भाषिक धोरण बदलावे हे सर्व मराठी शिक्षित मंडळींना कळ्कळीचे आवाहन.

--
अनिल गोरे उर्फ मराठीकाका
marathikaka@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.